Manoj Jarange : “उष्माघाताने मेलो तर सरकार जबाबदार” ; मनोज जरांगेंची आक्रमक भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ३० तारखेपासून सुरू होणारे उपोषण हे आतापर्यंतच्या आंदोलनांपेक्षा अधिक कठोर आणि निर्णायक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. “देशात कधी झाले नसेल असे उपोषण करणार आहे. मंडप नाही, सावली नाही... थेट रणरणत्या उन्हात बसणार. मला उष्माघात झाला किंवा काही बरेवाईट झाले तर त्याला सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील,” असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
अंतरवली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप नेते प्रसाद लाड यांनी भेट घेतल्यानंतरही आरक्षणाच्या प्रश्नावर कोणतीही ठोस हालचाल झाली नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. “सरकारला अनेकदा वेळ दिला, मुदती वाढवल्या, पण निर्णय काही होत नाही. आता आणखी वाट पाहणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“मागील उपोषणावेळी मंडप होता, सावली होती. मात्र यावेळी कोणतीही सुविधा नको. मे महिन्याच्या कडक उन्हातच उपोषणाला बसणार. मेलो तरी चालेल,” असे म्हणत त्यांनी आंदोलनाची तीव्रता अधोरेखित केली.
यावेळी त्यांनी मराठा समाजालाही शांततेचे आवाहन केले. “समाजबांधवांनी अंतरवली सराटीत येऊ नये. कोणताही उद्रेक करू नका. आपण शांततेत आणि संयमाने आपला हक्काचा लढा जिंकायचा आहे,” असे ते म्हणाले.
सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी विचारले, “मराठा-कुणबी मंत्रालय स्थापन करायला किती वेळ लागतो? पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी सदन नाही. सरकारला फक्त मराठ्यांची मते हवी आहेत का? गरीबांच्या प्रश्नांशी काही देणंघेणं नाही का?”
“आपण लढणारी आणि कष्ट करणारी औलाद आहोत. इतिहासात साम्राज्य उभं करणारे आपणच होतो. त्यामुळे निर्धास्त राहा, आपण हक्क मिळवणारच,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




Comments (0)
Facebook Comments (0)